सातबारावर वारस हक्क नोंदणीसाठी तलाठ्याने मागितली होती लाच
गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
गेवराई दि.२४ (नवनाथ आडे):- शेत जमीन सातबारावर वारसदार म्हणून नाव नोंद करण्यासाठी ६ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजनी सज्जा चे तलाठी सानप राजाभाऊ बाबुराव याला रंगेहात पकडले आहे. शेत जमीन सातबारावर वारसा हक्क अधारे नोंद करण्यासाठी तलाठी सानप यांनी ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला होता. राजनी सज्जा चे तलाठी सानप हे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राजनी सज्जा चे तलाठी सानप राजाभाऊ यांनी तक्रारदार यांच्या वडीलाचे नावे असलेल्या गट नंबर ३५/३ संगम जळगाव येथील असलेल्या शेत जमीन सातबारावर तक्रारदार व त्यांचे भाऊ व बहीण व आई यांचे नावे वारसा हक्क अधारे सातबारावर नोंद करण्यासाठी आलोसे सानप यांनी पंचा सक्षम ६ हजार रुपये लाचेची मागणी करून सदरील रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील गढी येथील एका खासगी कार्यालयात (दि.२१ मार्च २०२४) रोजी मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली आहे. ते निष्पन्न होऊन आज दि. २४ एप्रिल २०२४ रोजी लाच प्रकरणी तलाठी सानप राजाभाऊ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप अटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शंकर शिंदे, सापळा पथकातील श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, स्नेहलकुमार कोरंडे, अंबादास पुरी यांनी केली आहे.