सोयाबीनला नऊ हजार कापसाला पंधरा हजार भाव द्या सरसकट कर्जमाफी करा
** अथवा गांजा लागवडीचे परवाने द्या-दत्ता वाकसे**
वडवणी (शंकर जाधव):- पारंपरिक पिके गेल्या अनेक वर्षांपासून धोका देत असून, लागवड खर्चही निघत नाही. त्यातच त्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी न होता उलट वाढत आहे. सोयाबीन, कपाशी, तूर ही प्रमुख पिके शेतकऱ्यांची निराशा करीत असून, रब्बी हंगामही साथ देत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना गांज्याची लागवड करण्याची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी शेतकरीपुत्र तथा शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हॉइस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला उपमुख्यमंत्री कार्यालयाला आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे.
पावसाळ्याच्या ऐन काळात पावसाने दीड ते दोन महिन्याची प्रदीर्घ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन उत्पादनखर्चाची तोंडमिळवणीही करू शकले नाही.
सध्या सुरू असलेल्या अवकाळीने घरात येणारा कापूस भिजून त्याची माती झाली. त्याच्या वातीदेखील होत नाही, अशी दर्जाहीन, टाकाऊ कापसाची स्थिती झाली. तुरीचा फुलोर गळून पडला. झाडे जमिनीवर लोळली. तुरीचा दाणाही हाती लागणार नसल्याचे चित्र आहे. तथापि, हताश किंवा निराश न होता बळीराजा रब्बीमधील हरभरा, गहू, कांदा या पिकाच्या तयारीत जोमाने लागला. परंतु, अवकाळी पावसामुळे पेरलेले गहू, हरभरे व कांदा रोपे पूर्णतः नेस्तनाबूत झाल्यामुळे आता विविध बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज फेडावे कसे, खावे काय अन् द्यावे काय? अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. कोरोना महामारीसारख्या मोठ्या संकटातून कसाबसा वाचलेला ‘बळीराजा’ गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नापिकी, दुष्काळी संकटामुळे पुरता खचून गेला. यावर्षीसुद्धा अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा आत्महत्येच्या दारात उभा आहे. अशा संकटातून बळीराजाला वाचवण्यासाठी सरसकट कुठलेही नियम निकष न लावता कर्जमाफीची गरज आहे. त्याचबरोबर सोयाबीनला नऊ हजार तर कापसाला 15000 भाव देण्यात यावा व कर्जमाफी योजनेतील निकष, अटी जाचक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नाही, असे निवेदनात नमूद केले आहे. तर आधीच शेतकरी अस्मानी संकटानी ग्रासलेला आहे. त्यातच नियम, अटी लावून शेतकऱ्यांचा छळ केला जात असल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, शेतकरी सरकारकडे यापुढे कुठल्याही पिकाच्या हमीभावाची मागणी करणार नाहीत. शासनाने शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात शेतकरीपुत्र तथा सेफर्स इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हॉइस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी केली आहे