भगवानगड : मानवी जीवनातील न उलगडणारे कोडे आणि संसारातील कर्मप्राधान्य हे भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला कुरूक्षेत्रावर दिलेले ज्ञान आजही मनुष्याला तितकेच आवश्यक आहे. संस्कृत भाषेतील हे ज्ञान प्राकृत भाषेत विश्वमाऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगितले आहे. ज्ञानेश्वरीतील आनंदाचे सिध्दांत सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचे काम श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री हे करत असल्याने घराघरात ज्ञानेश्वरी दिसू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या घोगस पारगांव येथील ९० व्या नारळी सप्ताहात सात दिवस ही पर्वणी लाखो भाविकांनी अनुभवली. असे असले तरी सर्वांना हा लाभ घेता आला नसल्याने पुन्हा एकदा झी टॉकीजच्या माध्यमातून ते प्रसारण पुन:श्च सुरू केले आहे. ज्ञानेश्वरी भावकथा निरूपणाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
अनेक वेळा माणूस हा संसारात त्रासुन जातो आणि अशा वेळी यातून सावरण्यासाठी प्रभावी साधन म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. मात्र आपल्याला त्यातील माऊलीचे शब्द अनाकलनीय वाटतात आणि मग अर्थ न उलगडल्याने आनंद घेता येत नाही अशा द्विधा मनःस्थितीत सर्वसामान्यांना हा अर्थावबोध करून देण्याचे अवघड काम अगदी सोप्या भाषेत माणसाच्या हृदयात घर करून राहतील अशा शब्दात आनंदाचे सिध्दांत महंत शास्त्रीजी सांगतात आणि मग सहजच ग्रंथाबद्दल जिव्हाळा तयार होतो आणि संसारातील दु:खावर हलकिशी फुंकर घातली जाते. कर्म करत असतांना देखील पारमार्थिक कल्याणकारी हे सिध्दांत पुनश्च ऐकण्याची संधी उपलब्ध झी टाकीजने उपलब्ध करून दिली आहे. १६ ते २२ जून दरम्यान दररोज सकाळी ठीक साडेसात ते साडेनऊ या वेळेत ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण श्रवणाचा योग या माध्यमातून आलेला आहे. सर्वांनी या ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सोहळ्याचा आनंद घ्यावा.